जैन बांधवांची काशी- कारंजा
आध्यात्म, इतिहास, संस्कृती, सहिष्णुता, शिक्षण, सामाजिकता याची घट्ट वीण असणारी नगरी म्हणजे कारंजा. करंजऋषीच्या नावावरून करंजपूर आणि नंतर कारंजा अशी या गावाचे नाव ठरले. स्कंद पुराणातील पाताल खंडात याचा उल्लेख सापडतो. वाकाटकपूर्व राजवटीपासून तर देवगीरीचे यादव, मोगल, निजामशाही, नागपूरकर भोसल्यांच्या राजवटी गावाने अनुभवल्या. त्याची साक्ष दिल्लीवेश, दारव्हावेश, पोहावेश, मंगरुळवेश या भग्नावस्थेतील वेशी देतात. काण्णवाचा बंगला आणि कस्तुरीची हवेली याबाबत ऐकल्यास कारंजाच्या संपन्नतेची साक्ष पटते. पण, गावसंपन्नतेच्या आता आठवणी तेवढ्याच उरल्या आहेत. कारंजा हे जैन बांधवांची दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याला लागणाऱ्या धनप्राप्तीसाठी या गावावर स्वारी केली होती. गावात करंजऋषींनी विस्तीर्ण तलावाची निर्मिती केली. तो तलाव आजही ऋषी तलाव म्हणून या परिसरात ओळखला जातो. शहरात चंद्र तलावही आहे. आध्यात्माच्या आवडीने आलेल्या श्री संमतभ्रत महाराज यांनी १९१८मध्ये महावीर ब्रह्मचर्याश्रमाची स्थापना केली. महाराजांच्या प्रेरणेने समाजातील विधवा, निराधार महिलांचा लौकीक व धार्मिक शिक्षणासाठी कंकूबाई श्राविकाश्रमाची १९३४मध्ये स्थापना करण्यात आली. याच कंकूबाईच्या नावे कंकूबाई कन्या शाळा काढण्यात आली. श्वेततांबर जैन मंदिर व जैन स्थानकवासीयांचे साधनास्थळ कारंजा येथे आहे. एवढेच नव्हे तर येथील जैन मंदिरामध्ये असलेले लिखान अभ्यासकांसाठी एक पर्वणी आहे.
कारंजात १३७८मध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामींचा जन्म झाला. दत्त उपासक वासुदेवानंद सरस्वती यांनी स्वामींचे जन्म स्थान शोधून काढले. त्याठिकाणी नृसिंह सरस्वती स्वामींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. १९३४मध्ये मंदिराची उभारणी करण्यात आली. गुरू मंदिर या नावाने हे मंदिर भारतभर प्रसिद्ध आहे. याबरोबरच शहरात रेणुका माता, कामाक्षा माता, यक्षणी देवी, एकवीरा देवी, सिद्धेश्वार, चंद्रेश्व र, निळकंठेश्वकर, प्राण लिंगेश्वेर, नागनाथ, ही स्थाने आजही भाविकांची श्रद्धास्थाने आहेत.
श्रीराम मंदिर, बालाजी मंदिर, मुरलीधर मंदिर, विठ्ठल मंदिर, हरिहर मंदिर, बाराभाऊ राम मंदिर, अशी अनेक देवालये येथे आहेत. श्री समर्थ संप्रदायाचे तीन मठ येथे आहेत. शिक्षणाच्या बाबतीत गुणवंताचे कारंजे म्हणून या शहराचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. सांस्कृतिक चळवळीही रुजल्या. आज गावात उपजिल्हा रुग्णालय झाले. त्याची देखणी वास्तूही तयार झाली. पण, आवश्यक असलेला कर्मचारी आणि सोयीसुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. वनपर्यटन केंद्राचे प्रवेशशुल्क सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे ठरते. दर दोन दिवसाआड गावाला पाणीपुरवठा होतो.